संस्कार || काय भुललासी वरलिया रंगा। ऊस डोंगा परि रस नाहि डोंगा ।।


स्त्री सौंदर्याचा व्यापक विचार करत असताना मला संत तुकामेळा यांचा एक अभंग आठवला
काय भुललासी वरलिया रंगा। ऊस डोंगा परि रस नाहि डोंगा।।
ऊस वरुन पाहिला तर ओबडधोबड व खडबडीत दिसतो पण त्याचं अंतरंग गोड असल्याने रस गोडच निघतो. याच संदर्भातील बा भ बोरकरांची कविताही आठवते.
देखणे चेहरे जे अंतरिचे आरसे। सावळे की गोरटे या मोल नाही फारसे ।।
बाहय सौंदर्यापक्षा अंतरंग, आपलं मन या गोष्टींना जास्त महत्व आहे. आपल्या मनाची जडणघडण लहानपणापासूनच आईवडील करीत असतात. मोठा वाटा आईचाच असतो. आई आपल्या मुलींना शरीराची काळजी कशी घ्यायची याचे शिक्षण तर देतेच पण त्याचबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं, आपली व इतरांची काळजी कशी घ्यायची, स्वच्छता व टापटीप कशी ठेवायची हेही सांगत असते. शरीराबरोबरच मनाचं सौंदर्य वाढविण्याची जबाबदारीही तिचीच असते.




हे संस्कार महत्वाचे असतात इथं मला एक चोर व त्याच्या आईची गोष्ट आठवते.
हा मुलगा लहानपणापासून छोटया मोठया चोऱ्या करीत असे कधी पेन्सिल चोर, तर कधी खोडरबर चोर अशा गोष्टींनी त्याने सुरवात केली. मग छोटया वस्तू उचलून आणू लागला. त्याच्या आईने त्याला कधीच अडवलं नाही. मोठा झाल्यावर तो अट्टल चोर बनला व पकडला गेला कोर्टात हजर केल्यावर तो आईला मुस्कटात देऊन म्हणाला माझ्या इतकीच तुही गुन्हेगार आहेस, माझ्यावर वेळीच चांगले संस्कार झाले नाहीत म्हणून मी असा बनलो. थोडक्यात, संस्कार महत्वाचे तुमच्या अंतरंगावर त्याचा इम्पॅक्ट होत असतो.



आम्ही आमच्या प्रॉडक्टच्या ज्या जाहिराती करतो, त्यात सारा भर बाहयांगावरच असतो हे खरं आहे. तो एक बिझिनेसचा भाग असतो. एक गोष्ट खरी प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला उल्हासित, ताजंतवानं वाटलं पाहिजे तसं झालं तर मनही सुंदर होतं व त्याचं प्रतिबिंब तुमच्या चेहऱ्यावर उमटतं व तुम्ही सुंदर दिसू लागता.
- संजीव पेंढरकर